Thursday 11 January 2024

बाकी नापासांचे काय ?



त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न. आता अपयश आले तर तो कधीच ही परीक्षा देऊ शकणार नाही. जे स्वप्न घेऊन तो गावातून दिल्लीत आला. जे स्वप्न घेऊन तो गेल्या चार एक वर्षांपासून जगत होता. ज्या स्वप्नासाठी त्याने आपलं कुटुंब सोडलं, पडेल ती कामे, (अगदी शौचालय साफ करण्यापासून) केली. अपमान सहन केला, अवहेलना सहन केली. त्याचं IPS होण्याचं स्वप्न ऐका या मुलाखतीच्या यशावर अवलंबून होतं. अशात त्याला पॅनल मधला एक सदस्य विचारतो "निवड नाही झाली तर काय करणार ?"  , तो क्षणाचाही विलंब न करता सांगतो, "गावी जाऊन शाळा शिक्षक होणार."  इथपर्यंत पोहचल्यावर अपयश आले तर काय करायचे तर त्याच्याकडे  दुसरा प्लॅन तयार असतो. 

लाखो मुलं UPSC ची स्वप्न घेऊन दिल्ली सर करायला पोहचतात, अब दिल्ली दूर नाही म्हणत आपल्याकडे हजारो मुलं स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याची स्वप्न बघत असतात. आपल्या राज्यापुरता जरी विचार केला तरी कितीतरी ग्रामीण व निमशहरी भागातील साधारण घरची मुलं पुणेसारखे शहर गाठून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठं होण्याची स्वप्न पाहत असतात. दरवर्षी UPSC किंवा तत्सम स्पर्धापरीक्षेत यशस्वी झालेल्या मुलांची यादी प्रसिद्ध होते. त्यांचे कौतूक प्रसार माध्यमातून प्रसारित होते. घरी मुलाखत घेणाऱ्यांची गर्दी होते. पण दरवर्षी किती स्पर्धक अपयशी होतात. पास होणाऱ्या पेक्षा अपयशी होणाऱ्यांची यादी किती मोठी असते. त्यांचं पुढे काय होते ? काही लहान मोठया परिक्षेकडे वळतात. काहींचे सर्व प्रयत्न संपतात. काहींची वयोमर्यादा संपते. मग ती सर्व गर्दी कुठे जाते? अधिकारी होऊ न शकलेली किंवा कुठल्याच स्पर्धा परीक्षेत यशस्वी न झालेली ही मुले पुढील आयुष्यात काय करतात?  मी ज्या चित्रपटातील वरील प्रसंग सांगितला आहे त्याच चित्रपटात UPSC चे सर्व प्रयत्न संपल्यानंतर रिस्टार्ट म्हणत त्याच नावाने चहाची कॅन्टीन सुरू करणारा 'गौरी भैया' एकदम भाव खाऊन जातो. पूर्ण ताकत लावली पण अपयश आले, आता सर्व प्रयत्न (Attempt) झाले, मग पुढे काय ? अपयश आल्यावर चहाची कॅन्टीन सुरू करणारा 'गौरी भैया' असो की गावात जाऊन शाळा शिक्षक होणार म्हणून सांगणारा 'मनोज' असो. अपयश आले म्हणजे सर्व संपत नाही सांगणारा '12 Fail' चित्रपट लक्षात राहतो तो या साठी. सत्य कथेवर आधारित सशक्त कथानक, विधु विनोद चोप्राचं खास दिग्दर्शन, चित्रपटातील कथेशी एकरूप झालेलं कलाकार, यामुळं चित्रपट अतिशय प्रवाही झालेला आहे. अगदी आपल्या समोर सर्व कथा घडत असल्याचा भास निर्माण करण्यास, चित्रपटाची सर्व टीम यशस्वी झालेली आहे. 

अंतिम निकालाच्या दिवशी गेट उघडुन  निकाल पाहण्यासाठी धावत जाणारी गर्दी, यातील किती यशस्वी होणार? जी  नाही होणार त्यांनी नेहमी एक दुसरी वाट आधीच शोधून ठेवणे व त्यावर खुशीने मार्गक्रमण करत राहणे.  एका विलक्षण प्रेरणादायी यशाची कहाणी सांगणारा '12 Fail' चित्रपट. विधु विनोद चोप्राचा चाकोरीबाहेरचा आणखी एक उत्तम चित्रपट पाहिला नसेल, तर सर्वानी आवर्जून सहकुटुंब पाहायला काही हरकत नाही.

सुधीर वि. देशमुख
अमरावती.
११/०१/२४

Tuesday 25 July 2023

गारवाची पंचवीस वर्ष


'गारवा' रिलीज होऊन पंचवीस वर्षे झाली , पाहता पाहता पाव शतक झालं 'गारवा' अजूनही ताजा व टवटवीत आहे. चंद्राच्या शीतल चांदण्याला आयुष्य आहे का ? सांजवेळी ढगाआड लपलेला सूर्य व त्याची ढगांसोबत चालू असलेला लपवाछपवीचा खेळ. मधूनच काही किरणं ढगांच्या आडून बाहेर येतात, जसे मनाला गुंतवण्यासाठीच चालू असते  हे सर्व. मी कित्येक वर्षे झाली आजही आकाशात ढगांचे स्नेहसंमेलन सुरू असले की सर्व विसरून पाहत राहतो. हा ताजेपणा कधी जुना होऊ शकतो का ?  सततच्या पाहण्याने निसर्ग  कंटाळवाणा होत नाही प्रत्येक वेळी त्याची विविध रूपे मनाला भुरळ पाडत असतात. गारवाची जादू आजही कायम आहे त्यातील प्रत्येक गाण्याच्या आधीचं ते जीवघेणं निवेदन, एक एक ओळ आपल्यासाठीच लिहली असावी, असं तेव्हाही वाटायचं आणि आजही वाटते. वैशाखाच्या वनव्याने धरित्री तापून तप्त झालेली आहे. रखरखत्या उन्हाने देहाचे बेहाल झालेले आहे, अशात आषाढ ढगांना सोबत घेऊन येतो व मनसोक्त दंगा घालून जातो. कोरड्या झालेल्या नदीला पाजर फुटतो, ती बेभान होऊन समुद्राच्या मिलनासाठी धावू लागते. डोंगर, झाडी, वेली, वर्षाधारेच्या अभिषेकाने तृप्त होतात. अशावेळी गारवाचे एक एक शब्द या सर्व ऋतुचित्राला बोलतं करतात. अंतःकरणात दाबून ठेवलेल्या भावनेला वाट मोकळी करतात. पक्षी होऊन आकाशात विहार करून यावे तसं मन दरी खोऱ्यातून डोंगर झाडीतून भटकून येते. मन, त्याच्या आशा, त्याची स्वप्न, परत परत ताजी होत राहतात, गारवाही तसाच ताजा होऊन आपल्याला परत परत भेटत राहतो. गारवाच्या नंतर सांजगारवा आला त्यातील 'कधी सांजवेळी मला आठऊनी....' कितीवेळा ऐकलं असेल मी हे गीत. आठवणी शिळ्या होत नसतात, एक एक आठवण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दडून बसली असते. कुठल्या अवचित वेळी झपकन बाहेर येईल सांगता येत नाही. एकाद्या जागेसोबत बिलगून असलेल्या आठवणी घट्ट रुतून बसल्या असतात. तसच गारवा सोबत अशाच आठवणींचं कपाट भरून ठेवलं आहे बहुतेकांनी. नुकतेच गारवाच्या निमित्ताने  मुंबईत 'गारवा हवाहवासा' कार्यक्रम झाला असे कार्यक्रम मराठी समजणाऱ्या प्रत्येक गावागावात होवो. पुढच्या पिढीलाही गारवा असाच चिंब करत राहो एवढंच. 

सुधीर देशमुख
अमरावती. 
२५/०७/२३

Monday 18 January 2021

बाबुल की दुवाएं लेती जा !


सकाळी कष्टाने उभारलेले स्टेज उघडण्याची लगबग सुरू झालेली आहे. कोणीतरी मांडवात मोजक्याच गाद्या टाकत आहे. पक्की रसोई झोडून सुस्तावलेल्या देहांची आवरा आवर सुरू झालेली आहे. मांडवात अगदीच मोजकीच मंडळी शिल्लक आहे. मांडवाच्या आजूबाजूने नवरीच्या घरी, नवरी सोबत पाठवायची एखादी पोक्त बाई आणि एक दोन परकऱ्या मुलींच्या यादीवर अंतिम हात फिरवल्या जात आहे. नवरीच्या आईची उगीच लगबग सुरू आहे, नेमकं कशासाठी इकडे आलो ते तिलाच आठवत नाही आहे. सकाळी "बहारों फूल बरसावों, मेरा मेहबूब आया है!" च्या तालावर मांडवात आलेले नवरोजी नवरीची वाट पाहत मांडवात बसलेले आहे. सकाळी लावून असलेला बालीचा पाहुणा किंवा तत्सम पाहुणे मंडळींचा आव शांत झालेला आहे. मांडवात एक दोन मुलं शेवटचा चहा नाहीतर सरबत वैगरे सारखं काहीतरी फिरवत आहे. तिकडे मांडवाच्या मागे बिछायत वाल्याच्या पोराला, नवरीच्या भावाचा कोर ग्रुप मधला कोणी पोरगा भांडे मोजून देत आहे, त्याचा आवाज आत येत आहे. मांडवातच नवरदेवाच्या बाजूच्या मुलांची आंदनाची( भेटवस्तू) बांधाबांध सुरू झालेली आहे.आणि मग अचानक साऊंड सिस्टमवर सुरवात होते "बाबूल की दुवाएं लेती जा , जा तुझको सुखी संसार मिले !" या गाण्याची, मांडवात असलेल्या कुठल्याही पाहुण्यांचे त्या गाण्याकडे विशेष लक्ष जात नाही, उलट आवरा आता, एवढाच काय या गाण्याचा उपयोग. हे गाणं म्हणजे लग्नातील शेवटच्या टप्प्याची सुरवात. इकडे तिकडे फिरणाऱ्या वर्हाडीना मांडवात बसण्याचा इशारा. पण त्यावेळी या गाण्याशिवाय नवरीची पाठवणी होत नसे. त्याकाळात सकाळी बँडवर "बहारों फूल बरसावों!" व शेवटी रेकॉर्डवर "बाबुल की दुवाएं लेती जा!" या गाण्यांशीवाय लग्न होऊच शकत नव्हती. एकदाचा लग्न लावायला कोणी नसेल तर चालेल, पण ही गाणी वाजलीच पाहिजे असा त्यावेळी दण्डकच असावा. या सर्व लगबघित आतापर्यंत सर्व गोष्टींची रीतसर काळजी घेणारा एक व्यक्ती, मांडवात कुठे तरी कोपऱ्यात बसून आपले ओले झालेले डोळे लपवण्याचा प्रयत्नात असे. हळूहळू नवरदेव नवरी नमस्कार करत करत त्या व्यक्ती पर्यंत यायची आणि मग नवरीचा एकदम बांध फुटायचा. मग ती चुपचाप बसलेली व्यक्तीही आतापर्यंत रोखून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची. काहीवेळ सर्व स्तब्ध होत असे. नवरदेवालाही नेमकं काय करावं कळत नसे, तो मग आपला मोर्चा हळूच इतरांकडे वळवत असे. काल परवा पर्यंत योग्य स्थळ भेटत नाही म्हणून काळजी करणारा बाप आज मात्र आपले हुंदके रोखू शकत नसतो. नवरीची आई मोकळ्या मनाने रडू शकते, बाप मात्र तसा करू शकत नाही. पुरुषांनी रडायचं नसतं, असलं काहीतरी सामाजिक तत्व आपल्याकडे वर्षानुवर्षे जोपासल्या गेलं आहे. याला अपवाद म्हणजे नवरीचा बाप, त्याची ती घालमेल खरंतर कन्यादाना पासूनच सुरू झालेली असते, पण होमच्या धुराने डोळे लाल झाले आहेत असाच तो इतरांना भासवतो.
आज काळ बराच पुढे 'सरकलाय', शहरात तर लग्न मोठं मोठ्या चकाचक हॉलमध्ये, हॉटेलमध्ये होत आहे. नवरीचा बाप सुटात दिसतो. लग्नातील सर्व गोष्टींचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो. लग्न ही इव्हेंट झालेली आहे. "बाबुल की दुवाएं लेती जा!" सारखी गाणी वाजवणे कालबाह्य झालेलं आहे. पण तरी सुद्धा पाठवणीच्या वेळेस वर वर साऊंड सिस्टीम वर वाजत नसलेलं हे गाणं नवरीच्या बापाच्या काळजात मात्र आत आत सारखं सारखं वाजत असतं.

©सुधीर वि. देशमुख
अमरावती
१८/०१/२०२१



Thursday 17 December 2020

कटिंग, पाटली व हिप्पीकट

    लहापणी न्हावी काकाकडे गेलो की काका खुर्चीवर पाटली टाकायचे पाटलीवर बसने मला फार कमीपणाचे वाटायचे, आपण उगीच लहान असल्याची जाणीव होत असे. एकदा ती कसरत काकाची सुरु झाली की बस, मधे मधे मान आपण सरळ करायची तर काका दुसऱ्या बाजूला एकदम दाबायाचे. समजा त्याच बाजूला ठेवावी तर परत दुसऱ्या बाजूला दाबल्या जायची. नेमके कुठल्या बाजूला डोके ठेवावे हा प्रश्न मनात यायचा अवकाश की समोर एकदम झटक्यान डोकेे दाबल्या जाई व मागच्या बाजूच्या केसावर आक्रमण होई. बऱ्याचवेळा डोक्याला वाटेल तसे झटके देवून झाले की मग कैचीचे काम संपे, मग कैचिची जागा वस्तारा घेत असे. एकदा हा वस्तारा हातात आला की परत डोक्याला वाटेल तसे वाकवून होई कधी या वस्तऱ्यातुन एकदाची मुक्ती होते असे वाटायचे. कसे बसे एकदा हे वस्तरा पुराण संपले की मग सर्व शरीर झटकल्या जाई. मग ते केसाने माखलेले शरीर घरी आई च्या तावडीत जायचे. कटिंग करून काय आलो फार गुन्हा करून आल्यासारखे वाटायचे, या सर्व विधिंविषयी मला काही आक्षेप नव्हता, होता तो फक्त त्या खुर्चीवर पाटली टाकन्याचा. कधी एकदाचे आपण मोठे होतो व थेट खुर्चीवर बसून कटिंग करण्यास पात्र होतो असे सतत वाटायचे. त्या खुर्ची वर बसून मागच्या टेक्यावर आपले डोके टेकवायचं व कटिंग वाल्याने आपल्याला विचारत विचारत केस कापावे हे माझे तेव्हाचे स्वप्न होते. त्यावेळी मना सारखी हेयर कट ठेवण्याचे स्वातंत्र नव्हते. मी साधारण तीसरी मधे असेल, आम्ही त्यावेळी परतवाडाला राहत होतो, हिप्पी कट ची फैशन आली होती. देव आनंद च्या हरे कृष्ण हरे राम चा तो काळ होता. अमिताभ सारखे काही स्टार्स हिप्पी कट ठेवायचे. हिप्पी ठेवली तर पाटलीवर बसून कटींग करण्याच्या मानहानीला तेवढ़ीच अनुकम्पा मिळू शकेल असे मला वाटायचे. माझा मोठा भाऊ त्याकाळी महाविद्यालयात होता त्यामुळे दादाला असलेले स्वातंत्र आपल्यालाही मिळावे असे मला वाटायचे. शिवाय हिप्पी कट ठेवली की आपण या तरुण मुलांच्या गँग मधे हक्काने शामील होऊ असा माझा ग्रह होता. बाबा पोलिस विभागात त्यामुळे त्यांचा लांब केस ठेवन्यास भारी विरोध होता. मोठा भाऊ महाविद्यालयात गेल्या मुळे व तो अमरावतीला असल्यामुळे असेल कदाचित परंतु त्याला मात्र बाबांनी विरोध केला नव्हता. एकदा घरी बरेच आंदोलन केले, रडा-रडी फुगणे वैगरे प्रकार केले, तात्पुरता अन्नत्याग केला. परंतू बाबाला काही मागणी पटत नव्हती, शेवटी आई ने मध्यस्थी केली व बाबा हिप्पी कट साठी एकदाचे राजी झाले. त्या दिवशी मी कटिंग साठी पहिल्यांदा एवढा खुश होतो. आईचे तर सर्व लहान सहान कामे मी पटापट केली, जशी शेजारच्या काकूचे उसने आनलेले जिन्नस परत करने इत्यादी. त्या दिवशी कटींग वाल्या काकाच्या पाटलीवर मी खुशीत जाऊन बसलो. त्यांना वाटेल त्या दिशेने वाटेल तसे डोके दाबू दिले एकदम सहकार्य केले. एकदाची हिप्पी कट झाली. कटिंग करून येताना माझी देह बोली पार बदलून गेली होती, आता आपल्याला मोठ्या मुलांच्या गोष्टीत थेट सहभागी होता येइल असे वाटू लागले. मानेवर व कानावर येणाऱ्या त्या गुंडाळा झालेल्या केसांचे मला भारी कौतुक वाटत होते. त्या दिवशी काकाने पहिल्यांदाच डोक्याच्या मागे आरसा धरून माझे गोल गोल केलेले केस दाखवले. (मी पूर्ण सहकार्य केल्यामुळे असेल कदाचित) कान व मानेवर आलेले ते केस मिरवत मी माझ्याच तोर्यात होतो, परंतु माझा मानभंग दुसऱ्याच दिवशी झाला. मोठ्या मुलांनी एका खेळात मला कच्चा नींबू केले. कच्चा नींबू हा प्रकार फार विचित्र, बिन खात्याच्या मंत्री सारखा. खेळात स्थान तर मीळे परंतू आपल्या सहभागाची फारशी दखल घेतल्या जात नाही. लहान मुलांनी घरी जाउन आईचे डोके खाऊ नये व आपल्या खेळात काही विघ्न येवू नये म्हणून मोठ्या मुलांनी केलिली सोय म्हणजे कच्चा नींबू होय. याशिवाय बारीक चिरीक कामे करण्यासाठी ही बारकी पोर कामी येत होती. अलीकडे सरकार स्थापन्यात देखील या तत्वाची मदत होते. हिप्पी कटचा मोठ्या होण्यात फरसा उपयोग दिसत नव्हता. शाळेत मास्तरच्या हातात सहजच केस लागत होते त्यामुळे मिळू नये त्या गुन्ह्याची सुद्धा शिक्षा मिळू लागली होती. लांब केस असणारी मूलं बदमाशी करण्यात आघाडीवर असतात असा बहुतेकांचा समज असतो. जसे चश्मा असणारी मूलं हुशार असतात असे बऱ्याच लोकांना वाटते पुढे दहावीत मलाच चश्मा लागला व हा गोड गैरसमज माझ्यासह इतरांचा देखील दूर झाला. हिप्पीकटचे फायदे तर काही दिसत नव्हते परंतु तोटे जागोजागी जाणवत होते. मित्रांचे आई वडील वेगळ्याच नजरने पाहू लागले, शाळेत गुरूजीला जसे शस्त्र मिळाले होते तसेच घरी बाबालाही त्यांचा राग शांत करण्यास "केस" हाती लागली होती, तसेही त्यांच्या मनाविरुद्धच मी कटिंग केली होती.

 या नंतर मात्र मी हिप्पी कट केली नाही एवढेच काय तर बरेच वर्ष म्हणजे (खरच मोठे होई पर्यंत) लांब केस सुध्दा ठेवले नाही. आज मुलाला कटिंग साठी घेवून गेलो कटिंगवाल्याने मुलाला पाटलीवर बसवले, मी मात्र मुलाकडे उगीच सहानभुतीने पाहू लागलो.

रविवार
16/7/17

अमरावती

Like


Comment
Share

Comments

Comments

Sunday 8 November 2020

"पुलकित "



©सुधीर वि. देशमुख



एखाद्या व्यक्तीची आपल्या आयुष्यात काय जागा असावी ? कधी कधी शब्दही थिटे पडतात. नकळत्या वयात अजाणतेपणी यांची पुस्तके हाती आली. माझा मोठा भाऊ यांचा भारी फॅन होता, यांच्या जवळ जवळ सर्व प्रकाशित ग्रंथांचा वैयक्तिक संग्रह भाऊकडे होता. असं आहे तरी काय यांनी लिहलेले, या उत्सुकतेपोटी मी यांची काही पुस्तके तेव्हा वाचली होती. एकदम सर्व समजत नव्हतं पण वाचतांना गंम्मत वाटायची. नंतर मात्र यांचं एकूण एक प्रकाशित साहित्य आपण वाचायचंच असं ठरवलं, हळूहळू मी ही माझ्या कडे काही पुस्तके जमवली. बरीचशी वाचली, काही परत परत वाचली, काही मोजकी अजूनही बाकी आहे. यासम हाच एवढंच आपण म्हणू शकतो. सुरवातीच्या काळात कारकुनी पासून तर प्राध्यापकी पर्यंत अनेक नोकरी केल्या.  हे भारतीय दूरदर्शनचे पहिले निर्मिती प्रमुख होते. (पहिले प्रधानमंत्री पंडित नेहुरुजींची मुलाखतीच्या कार्यक्रमाची निर्मिती यांचीच) आकाशवाणी,दूरदर्शन,  चित्रपट, नाट्य,एकपात्री सादरीकरण, संगीत, लेखन,भाषण, समाजसेवा अश्या अनेक क्षेत्रातील यांचा संचार बघितला तर आपण थक्क होतो. एक व्यक्ती एकाच आयुष्यात एवढं सर्व कसं काय निर्माण करू शकतो हा प्रश्न पडतो. कुठल्याही क्षेत्रात नवोदितांना सिद्ध करण्यासाठी प्रचंड त्रास होतो हे यांना माहीत होते. यांनी नवीन लोकांना मोकळ्या मनाने शाबासकी दिली. अनेक चांगल्या कलावंतांना माहराष्ट्राशी परिचित करून दिले. आपल्या संपूर्ण हयातीत कोणालाही  जाणिपूर्वक दुखवले नाही, तर फक्त हसवलेच, पण मात्र आणीबाणीचा जिगरबाजपणे विरोध केला. पुढे जनता पक्षाचे सरकार आल्यावर सरकारपासून अलिप्त राहिले. सत्तेशी सलगी करून पदे पदरात पाडून घेणं यांना माहीत नव्हतं. तरी देखील यांच्या कर्तृत्वाच्या भरवश्यावर यांना संगीत, नाट्य व साहित्य इत्यादी क्षेत्रातील मानाची सर्वोच्च पदे मिळत गेली. आचार्य अत्रे म्हणतात यांच्या 'तुज आहे तुजपाशी' या एवढ्या एका नाटकासाठी मी यांना उत्कृष्ट नाटककार मानायला तयार आहे. आणि यांनी हे नाटक फक्त अडीच दिवसात लिहून पूर्ण केलं होतं.  हे  पदमभूषण , महाराष्ट्रभूषण तर आहेतच पण त्याही उपर समस्त मराठी जनतेचे लाडके आहेत. महाराष्ट्राचं "लाडकं व्यक्तिमत्व" म्हणून आजही मराठी जनता त्यांना अभिमानाने संबोधित करते. पुलस्पर्श न झालेला साहित्य प्रेमी कदाचितच आपल्या येथे असेल, आणि एखादा असेल तर तो साहित्यप्रेमी तरी नसेन.  चार्ली चॅपलीन व गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची श्रद्धास्थान होती. चार्लीला तर शांततेचे नोबेल दयायला हवे असे ते म्हणायचे. गुरुदेवांच्या साहित्यवरील प्रेमापोटी चाळीशीच्या नंतर बंगाली शिकले. तिथे शांतिनिकेतनला जाऊन राहिले. समाज कार्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल यांना प्रचंड आस्था होती, विनोबांच्या भूदान यात्रेच्या वेळी काही दिवस त्यांच्या सोबत बिहारला फिरले. बाबा आमटेंच्या आनंदवनला नियमित भेट द्यायचे. त्यांच्या पु ल देशपांडे फाउंडेशनने अनेक सामाजिक संस्थांना मदतीचा हात दिला, त्यांचे दातृत्व विशाल होते. मुक्तांगण पासून तर आमच्या अमरावतीच्या वजीर पटेल पर्यंत अनेक सत्पात्री संस्थेला/व्यक्तींना त्यांनी मुक्तहस्ते मदत दिली. पुलं आनंदयात्री होते, जगण्याचं मर्म त्यांना समजले होते, त्यामुळे ते लौकीक अर्थाने योगी नसूनही योगीप्रमाणे निर्मोही होऊन जगू शकले. त्यांच्या साहित्याने, कलेने आपलं जीवन पुलकित झालं आहे एवढंच आपण कृतार्थ भावनेने म्हणू शकतो. उद्या 'भेटलेल्या आयुष्याचे तू काय केलं?' असं नियतीने विचारलेच, तर 'मी पुलकित होऊन आलो आहे!', एवढं मात्र मी आत्मविश्वासाने सांगेल.


ता. क. :आज यांच्या वाढदिवसाला  गुगलने यांचं डुडल ठेवून समस्त पुलप्रेमींना आनंदित केले आहे. 


अमरावती

८/११/२०२०


Saturday 26 September 2020

'तोचि पुरुष भाग्यचा' 

गांधीजींच्या यशा मागचं एक महत्वाचं कारण सांगीतल्या जाते ते म्हणजे ते युवकांना रचनात्मक कार्यक्रम द्यायचे. एक कार्यक्रम संपला की त्यांची पुढीची दिशा व त्यासाठी करावयाच्या कृतींचा आराखडा तयार असायचा. त्यांच्या समर्थकांना ते सतत गुंतून ठेवायचे. सोबत स्वतःची व इतरांच्या मनाची मशागत विविध मार्गाने सुरूच असायची . हे झाले सार्वजनिक जीवणाबाबत. वैयक्तिक जीवनात देखील असंच असू शकतं का ? स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी देखील असा दीर्घ पल्ल्याचा किंवा लघु पल्याचा आराखडा तयार असणे आवश्यक आहे का? आपण रोज सकाळी उठतो, सर्वच उठतात, अर्थात आयुष्य एका दिवसाने वाढले असेल तर. सकाळी जाग आल्यावर  एवढया मोठया दिवसाचं आता मी काय करू, हा प्रश्न ज्या व्यक्तीच्या समोर निर्माण होतो तो माझ्या दृष्टीने दुर्दैवी व्यक्ती, तो मग कितीही धनवान असला तरी. मिळालेल्या वेळचं मी काय करू, हा प्रश्न जिथे निर्माण होतो तिथं उदासपणाचा, खिन्नतेचा जन्म होतो. मनुष्य सदा कदा आनंदी राहू शकत नाही हे जरी खरे असले तरी ज्याच्या कडे वैयक्तिक कामाची यादी नाही, तो जीवनाला लवकर कंटाळु शकतो. खूप मोठे धेय्यच असले पाहिजे असं नाही. आपण सर्वांनीच काहीतरी भव्य दिव्य केलं पाहिजे असंही नाही. नवनवीन चांगलं करत राहण्याची, नवनवीन अनुभव घेण्याची हौस माणसाला जगवतं ठेवत असते. कुठलेही श्रम न करता पदरात प्राप्त झालेल्या क्षणाचा उपयोग जो घेऊ शकतो तोच काही तरी  निर्माण करू शकतो. थोडक्यात काय तर मनाची गुंतवणूक आवश्यक आहे.  कुठलंही रचनात्मक/विधायक काम करत असताना वेळ कसा निघून गेला हे ज्याला कळत नाही, त्याचे आयुष्यही असेच हसतखेळत निघून जाते. एखादं चित्र काढतांना, काही तरी चांगलं वाचतांना, बागकाम करतांना, घर स्वच्छ करतांना, चांगलं गाणं ऐकतांना, बाळाचे स्नान करून देतांना, पाळीव प्राण्याची काही सेवा करतांना (यादीत खूप काही मिळवता येईल ) मिळणारा आनंद,  विकार रहित असतो.  छोट्या छोट्या कामाची का असेना पण काहीतरी योग्य कृतींची यादी असणे आवश्यक आहे,  नाही तर आयुष्य ओझं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच वैयक्तिक आयुष्यात, सकाळी उठल्यावर दिवसभर गुंतवून घेण्यासाठी ज्याच्या कडे  कार्यक्रम आहे,  'तोचि पुरुष भाग्यचा'.

©सुधीर वि. देशमुख
अमरावती
२७/०९/२०

'तोचि पुरुष भाग्यचा'


गांधीजींच्या यशा मागचं एक महत्वाचं कारण सांगीतल्या जाते ते म्हणजे ते युवकांना रचनात्मक कार्यक्रम द्यायचे. एक कार्यक्रम संपला की त्यांची पुढीची दिशा व त्यासाठी करावयाच्या कृतींचा आराखडा तयार असायचा. त्यांच्या समर्थकांना ते सतत गुंतून ठेवायचे. सोबत स्वतःची व इतरांच्या मनाची मशागत विविध मार्गाने सुरूच असायची . हे झाले सार्वजनिक जीवणाबाबत. वैयक्तिक जीवनात देखील असंच असू शकतं का ? स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी देखील असा दीर्घ पल्ल्याचा किंवा लघु पल्याचा आराखडा तयार असणे आवश्यक आहे का? आपण रोज सकाळी उठतो, सर्वच उठतात, अर्थात आयुष्य एका दिवसाने वाढले असेल तर. सकाळी जाग आल्यावर  एवढया मोठया दिवसाचं आता मी काय करू, हा प्रश्न ज्या व्यक्तीच्या समोर निर्माण होतो तो माझ्या दृष्टीने दुर्दैवी व्यक्ती, तो मग कितीही धनवान असला तरी. मिळालेल्या वेळचं मी काय करू, हा प्रश्न जिथे निर्माण होतो तिथं उदासपणाचा, खिन्नतेचा जन्म होतो. मनुष्य सदा कदा आनंदी राहू शकत नाही हे जरी खरे असले तरी ज्याच्या कडे वैयक्तिक कामाची यादी नाही, तो जीवनाला लवकर कंटाळु शकतो. खूप मोठे धेय्यच असले पाहिजे असं नाही. नवनवीन चांगलं करत राहण्याची, नवनवीन अनुभव घेण्याची हौस माणसाला जगवतं ठेवत असते. कुठलेही श्रम न करता पदरात प्राप्त झालेल्या क्षणाचा उपयोग जो घेऊ शकतो तोच काही तरी  निर्माण करू शकतो. थोडक्यात काय तर मनाची गुंतवणूक आवश्यक आहे.  कुठलंही रचनात्मक काम करत असताना वेळ कसा निघून गेला हे ज्याला कळत नाही, त्याचे आयुष्यही असेच हसतखेळत निघून जाते. एखादं चित्र काढतांना, काही तरी चांगलं वाचतांना, बागकाम करतांना, घर स्वच्छ करतांना, चांगलं गाणं ऐकतांना, बाळाचे स्नान करून देतांना (यादीत खूप काही मिळवता येईल ) मिळणारा आनंद,  विकार रहित असतो.  छोट्या छोट्या कामाची का असेना पण काहीतरी योग्य कृतींची यादी असणे आवश्यक आहे,  नाही तर आयुष्य ओझं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच वैयक्तिक आयुष्यात, सकाळी उठल्यावर दिवसभर गुंतवून घेण्यासाठी ज्याच्या कडे  कार्यक्रम आहे,  'तोचि पुरुष भाग्यचा'. 

©सुधीर वि. देशमुख

अमरावती

२७/०९/२०

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...